Monday, December 25, 2017

Merry Christmas

श्री गजाननविजय ग्रंथात दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे "पंथ चालण्या प्रारंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशांचाच होतो भला, तंटा पंथाभिमानाने" अमरावतीवरून नागपूरला येण्यासाठी मोर्शी-वरूड-काटोल, गुरूकुंज मोझरी-तळेगाव-कोंढाळी आणि चांदूर रेल्वे-वर्धा असे तीन पूर्णपणे भिन्न मार्ग आहेत. ज्या लोकांनी या आपापल्या मार्गावरून चालून नागपूर गाठले त्या लोकांनाच "हे तिन्ही मार्ग एकाच मुक्कामाला पोहोचतात" याचे ज्ञान होईल. पण एखादी माणूस वर्धेपर्यंत आलाय, दुसरा काटोलला आलाय आणि तिसरा कोंढाळीला आलाय आणि एकमेकांशी फ़ोनवरून बोलून "अरे, माझाच मार्ग नागपूरला जातोय. तू चुकीच्या मार्गावर आहेस." असे सांगू लागला तर किती मूर्खपणा ?

आजकाल प्रत्येक धर्मातल्या अकारण कडव्या धर्मनिष्ठांची हीच अवस्था झालीय. (मी त्यांना मुद्दाम "मूलतत्ववादी" म्हणत नाहीये. कारण त्या सर्वांना आपापल्या धर्माची मूलतत्वे समजली असती तर त्यांना सगळ्या धर्मांमधल्या मूलतत्वाचा बोध होऊन सगळे धर्म मनुष्याला शेवटी मनुष्यपणाच्या उन्नतीलाच नेतात हे कळले असते.) धर्मातल्या गोष्टींचा आपल्या मताप्रमाणे अन्वयार्थ लावायचा आणि अर्धवट ज्ञानाने परधर्मीयांचा द्वेष करायचा ही ख-या धर्मवेत्त्याची लक्षणे नव्हेत. आज आपल्या धर्माचा सण नाही म्हणून परधर्मीयांना शुभेच्छा देऊ नका असे संदेश प्रत्येक सणांच्या आधी व्हॉटसऍप नामक धुमाकुळाच्या माध्यमातून फ़िरतात आणि अर्धवट रिकामी डोकी भडकतात. 

स्वतःला क्रुसावर चढवणा-या लोकांसाठी "देवा, या लोकांना माफ़ कर. हे काय करताहेत हे यांनाच कळत नाही" अशी प्रार्थना करणारी कारूण्यमूर्ती येशू ख्रिस्त आणि आईवडीलांच्या आत्महत्येच्या पायश्चित्तानंतरही लहान लहान भावंडांचा माणूसपणाचा अधिकार ज्यांनी हिरावून घेतला, त्यांच्या बद्दलही "जो जे वांछिल तो ते लाहो" अशी विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करणारी ज्ञानोबा माउली यांच्यात फ़रक कसा करावा ? त्यांचे अनुयायी धर्माच्या बाबतीत काय गोंधळ घालताहेत त्याचा विरोध नक्की व्हावा. (धर्मप्रसारासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगणारे मिशनरीज काय आणि ज्ञानदेवांच्या "जे खळांची व्यंकटी सांडो" चा अर्थ लावून दुस-याला पहिल्यांदा "खलपुरूष" ठरवून मोकळे होणारे ठोकळे काय ? दोघेही सारखेच व्हिलन.



पण आज कारूण्यमूर्ती भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या मोकळ्या मनाने एकमेकांना शुभेछा तर देऊयात. त्यांच्या मनातल्या करूणेपैकी एक लक्षांश करूणा जरी आपल्या मनात आली तरी आपण हा भवसागर तरून जाऊ हा विश्वास वाळगूयात.

शेवटी दासगणूंच्याच शब्दांचा आधार घेत माझे विवेचन थांबवतो.
"धर्म बापा ज्याचा त्यानी, प्रिय मानावा सर्वाहूनी,
परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे."

No comments:

Post a Comment