Sunday, December 24, 2017

"मी" मलाच भेटतो तेव्हा.....दोस्तांचे रियुनियन

डी डी एल जे मध्ये अमरीश पुरी जसा शेवटी काजोलला "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" म्हणतो अगदी तशीच परमिशन काल आमच्या सौभाग्यवतींकडून घेतली. निमित्त होते ते १९८८-१९८९ मध्ये ११ वी आणि १२ वी त असलेल्या आमच्या सी. पी. ऍण्ड बेरार रवीनगर शाखेच्या मुलामुलींचे संमेलन. (या सगळ्यांना मुलमुली म्हणावे का की काकाकाकूच म्हणावे या विचारात अख्खा अर्धा तास घालवल्यावर माझ्यासकट सगळ्यांच्या हृदयावर मोरपीस फ़िरवणारा हा शब्द मुद्दाम वापरला.)


आमची शाळा. सी.पी. ऍण्ड बेरार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, रवीनगर शाखा.


आमची बॅच.


सगळ्या मुलामुलींचा पुन्हा शाळेच्या बाकांवर बसण्याचा उत्साह.


अनंता ढोले वगळता इतर सर्व व्रात्य असलेली मंडळी पुन्हा वर्गात.


शाळेतल्या स्टेजवर तत्कालीन विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी झालेली आहेत. शाळेला किती अभिमान वाटत असेल नाही ?


थोडी गंमत, मौजमजा. 

मी तसा उशीराच जॉइन झालो. कितीही टाळायच्या म्हटल्या तरी रोजच्या नोकरी, व्यवसाय विषयक जबाबदा-या टाळता येत नाहीत. महाविद्यालयीन कामकाज आटोपून निघायला दुपारचा दीड वाजला. तोवर मनात धाकधूक होती की ही मंडळी थांबली असतील की नाही. पण तोवर सगळी मंडळी शाळेतून निघून अनंत ढोलेच्या घरी, रवीनगरलाच थांबलेली होती.


अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.


                        अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.

मी जावून पोहोचलो खरा पण तिथे जमलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना मला ओळखताच येईना. जवळपास २८ वर्षांनी या सगळ्यांची भेट होत होती. फ़ेसबुकवर पुष्कराज काळे, उज्ज्वल डाबे, भारती डोंगरे आदींच्या संपर्कात होतो आणि काही मंडळी २८ वर्षांनंतरही अजिबात बदलली नव्हती. त्यांचा अपवाद वगळता इतरांच्या पुन्हा ओळखी झाल्यात. अगदी २८ वर्षांच अंतर क्षणात पुसून टाकणारी घट्ट मिठी झाली.

त्यानंतर मग तासभर खाण्यात आणि गप्पांमध्ये जो मोकळेपणा मी अनुभवला तो अवर्णनीय होता, आहे आणि राहिलही. इतक दडपणाविना, अकृत्रिम, मोकळ जगण्याची माझी सवय गेल्या कित्येक वर्षात कुठे नाहीशी झाली याचा मला पत्ताच लागेना. पण काल पुन्हा जुन्या "मी" ला "मी" च नव्याने भेटलो. एकदम ताजातवाना झालो.


गवसलेला माझा मी. 

1 comment: