Wednesday, September 28, 2016

प्रबंध सरळी दे रे राम...

प्रबंध म्हटल्यावर आपल्याला अनेक विद्यापीठीय विद्वान आठवतात. त्यांचे शोध प्रबंध. त्यातली ती विद्वत्तापूर्ण भाषा. आणि सर्वसामान्यांचा त्यांच्याबद्दलचा "आपल्याला त्यांच्या विषयातल तर काही कळत नाही बुवा ." हा कबुलीवजा आदर. जेव्हढं क्लिष्ट, गंभीर तेव्हढं काहीतरी विद्वत्तापूर्ण अशी आपली समजूत झालेली आहे की काय न कळे. 

पण पृथ्वीतलावरचा आजवरचा सर्वात हुशार माणूस काय म्हणतोय ते पण आपण लक्षात घेतल पाहिजे. अहो आपल्याला जर तो विषय नीट समजला तर आणि तरच तो आपण दुस-याला नीट समजावून देऊ शकू ना ?



१९९४ मध्ये यू. पी. एस. सी. परीक्षेसाठी मी मराठी वाड.मय हा विषय ऑप्शन म्हणून घेतला होता. आपल्याला मराठी साहित्यात गती आहे हा माझा आत्मविश्वास वि. ल. भावे कृत "मराठी साहित्याचा इतिहास" आणि मराठी सौंदर्यशास्त्रावरची पुस्तके वाचायला घेतल्यावर पार लयाला गेला.  परिणाम असा झाला की मराठी लिटरेचर आम्हालाच नीट कळलं नाही. त्यामुळे आमचे आय. ए. एस. चे स्वप्न भंगलेच. (फ़ायदा हाच झाला की त्यानंतर पु. लं. च "मराठी वाड.मयाचा गाळीव इतिहास" वाचताना त्यातले नेमके पंचेस कुणाला आणि कुठे मारलेत ते कळून घेऊ शकलो. आणि "भिंत पिवळी पडली" हे एक सौंदर्यवाचक विधान या लेखातले टोमणे नव्याने समजलेत.)

सुदैवाने मला माझ्या पदवी, (Dr. J. G. Muley) पदव्युत्त्अर (एम. टेक.) (Dr. Y. S. Golait)  आणि आचार्य पदवी (पी. एच. डी.) (Dr. R. A. Hegde and Dr. Jigisha Vashi) शिक्षणातही जे मार्गदर्शक लाभलेत त्यांचाही आइनस्टाईनच्या या विधानावर ठाम विश्वास होता आणि आहे. त्यामुळे माझा प्रबंध, मी नक्की काय काम करतोय ? हे सोप्या भाषेत मी सगळ्यांना सांगू शकतो. पण त्याचा तोटा असा होतो की बहुतांशी मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक यांचा माझ्या संशोधनावर विश्वासच बसत नाही. "ह्या ! संशोधन इतकं सोपं कसं असेल ?" हा प्रश्न त्यांच्या चेहे-यावर मला वाचता येतो. अर्थात त्यामागचे माझे श्रम, माझे अप्लीकेशन्स माझ्या मार्गदर्शकांना माहिती आहे म्हणून बरय. त्यांना त्याविषयी शंका नाही.

आज समाजात वावरताना विद्वत्तेची झूल पांघरलेली अनेक मंडळी आपल्याला दिसतात. साधा सोपा विषय खूप कठीण करून सांगणे, वेळ भरपूर असतानाही खूप व्यस्त आहोत असे भासवणे अशा मंडळींचा सुकाळू आजकाल सर्वच क्षेत्रात वाढला आहे. सोप काहीतरी मांडणे, दुस-याला वेळ देणे या गोष्टी म्हणजे आपल्या समाजात आजकाल माणूस विद्वान नसल्याचे आणि रिकामटेकडा असल्याचे लक्षण होत चाललेय. समर्थांची उक्ती आपण खरच विसरत चाललोय.

समर्थांनी रामरायाकडे मागणे मागताना " प्रबंध सरळी दे रे राम " का मागितल असेल ? याचा खोल विचार करताना आपल्याला लक्षात येईल की समाजहितासाठी सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आणि शैलीत आपले प्रतिपादन आवश्यक आहे. आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही आपला शोध खरोखर सर्वसामान्यांच्या उपयोगात आणायचा असेल तर तो सोपा असणे आवश्यक आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांपायी आपण हे विसरत चाललोय का ?

2 comments: