Wednesday, August 17, 2016

शिवशाही : एक चिंतन

साधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची "शिवशाही" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही बातमी वाचली आणि अपेक्षा उंचावल्यात. अर्थात मनात शंका होत्याच. यापूर्वीचा एस.टी.चा आराम गाड्यांच्या व्यवस्थापनाबाबतचा अनुभव फ़ारसा चांगला नाही आणि बदलत्या काळासोबत बदलायला एस.टी. तयार नाही ही त्या शंकेमागची रास्त कारणे. उदाहरणार्थ:

१. ७ जुलै २०१२ रोजी एस.टी. ने नागपूर - चंद्रपूर या १५३ किमी मार्गावर  वातानुकुलीत आराम सेवा "शीतल" सुरू केली. भर पावसाळा म्हणजे ऑफ़ सिझन आणि त्यातही तिचे तिकीट २२५ रूपयांच्या आसपास ठेवले.{सुमेघ देशभ्रतार साहेब, बरोबर ना ? या बसच्या पहिल्या प्रवासात आमचे बसफ़ॅन मित्र सुमेघ देशभ्रतार हे एक (आणि बहुतेक एकमात्र) प्रवासी होते.} खाजगी आराम गाड्या भर उन्हाळ्यात २०० रूपयांच्या आसपास वातानुकुलीत सेवा देत असताना ही सेवा एप्रिल महिन्यात एस.टी. ने एव्हढ्याच रूपयांत दिली असती तर थोडा तरी प्रतिसाद मिळाला असता पण नियोजनशून्य धोरणांमुळे ऑफ़ सिझनमध्ये ७ - ८ दिवसांनंतर ही सेवा बंद पडली.

२. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात एस.टी. ने मुंबई - नागपूर व्हॉल्व्हो सेवा सुरू केली. तिकीट दर २२०० रूपये "फ़क्त". यापेक्षा कमी दर रेल्वेच्या २ टायर एसी च्या तत्काळ सेवेचा असतो आणि एव्हढ्या पैशात आणखी २०० रूपये टाकलेत की फ़र्स्ट क्लास एसी ने आरामात आणि जवळपास निम्म्या वेळात प्रवास होतो. फ़र्स्ट एसी ची तिकीटेसुद्धा या प्रवासासाठी साधारण आठवडाभर आधी उपलब्ध असतात. मग काय ? व्हायचे तेच झाले आणि ही सर्व्हिसपण "सुपरफ़्लॉप" ठरली.

३. मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक आणि काही प्रमाणात पुणे - नाशिक सेवा सोडता एस.टी.ची आरामबस सेवा पूर्णपणे फ़्लॉप ठरल्याची उदाहरणे मुंबई - पणजी, कोल्हापूर - पणजी, मुंबई - हैद्राबाद (स्कॅनिया प्रयोग) भरपूर आहेत.

४. यामागील सरकारमधील परिवहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवतायत का ? अहेरी - मुंबई महाबसचा २५ तासांचा आणि ११०० रूपये तिकीटांचा तुघलकी प्रयोग त्यांनी केलेला होता. अहेरी हा त्यांचा मतदारसंघ ना ? म्हणून. काय झाल ? काही फ़े-यांनंतरच हा प्रयोग बंद पडला.

५. आताच चंद्रपूर - पुणे स्कॅनिया बस सुरू होणार अशी बातमी वाचली. तिकीट दर फ़क्त २२०० रूपये. १२०० रूपयांच्या आसपास प्रसन्नच्या पर्पल प्लस स्लीपरने हा प्रवास सोडून कोण हा १४ तासांचा प्रवास बसून करणार आहे ? तो पण एव्हढा महाग ! "दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेव म्हणाव" हे अंतू बर्व्याचे वाक्य आठवले.




दरवेळी महाग तिकीटांचा विषय निघाला की "आम्ही, शासनाकडे कर भरतो. खाजगीवाले भरत नाहीत. म्हणून त्यांना स्वस्त तिकीटे परवडतात." असा ठरलेला युक्तीवाद केला जातो. पण अरे तो बोजा सर्वसामान्य प्रवाशांवर का ? शासनाला करमाफ़ी मागा ना ? असली अवास्तव भाडी भरून कुणीही तुमच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार नाही हे तुमच्या लक्षात येतय का ? अरे बाबांनो तुमचे जुने दिवस गेलेत. आता प्रवासी केंद्रीत नियोजनाचे दिवस आलेत. एखाद्या मार्गावर स्पर्धा करण्यासाठी भाडी कमी ठेवावी लागतीलच हे सत्य एस. टी. जेव्हढ्या लवकर ओळखेल तेव्हढ्या लवकर एस. टी. ला चांगले दिवस येतील.

असो, तर ही शिवशाही बस म्हणे एस.टी. भाडेतत्वावर खाजगी ऑपरेटर्सकडून घेणार आणि चालवणार. "दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फ़ुंकून पितो" ही म्हण एस. टी. ला माहिती नसावी. मागे महाबसच्या आणि आत्ताही व्हॉल्व्होच्या प्रयोगावेळी खाजगीवाल्यांची चंगळ झाली होती आणि एस. टी. अधिकाधिक खड्ड्यात गेली होती ही गोष्ट एस. टी. चे अधिकारी विसरलेत की काय ? की त्यातही काही हितसंबंध गुंतलेत ? अरे बाबांनो, तुमच्याकडे एव्हढा प्रशिक्षित चालक वाहकांचा ताफ़ा असताना खाजगीकडे चालकत्व का ? तुमच्या तीन तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. मग त्यातल्या कर्मचा-यांना स्लीपर बस बांधण्याचे प्रशिक्षण तुम्ही देवू शकत नाही आणि या गाड्या आपल्याच कार्यशाळांमध्ये बांधू शकत नाहीत ? एकेकाळी डब्ब्यासारखी ठोकळेबाज बांधणी करणारे इंदौरमधले छोटे छोटे गॅरेजेस जर छान लक्झरी कोचेस बांधू शकतात तर सतलज पंजाब, आझाद बंगलोर च्या तोडीच्या गाड्या आपणच आपल्या कार्यशाळांमध्ये सुंदरपणे बांधू शकतो. गरज आहे ती आपल्या कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवण्याची.

एक एस. टी. प्रेमी म्हणून सध्याच्या स्थितीतही मी "शिवशाही" यशस्वी कशी होईल याचा विचार करतो तेव्हा मला खालील ३ महत्वाचे मुद्दे सुचतात.

१. रिझर्वेशन सिस्टीम
२. मार्गांचे नियोजन आणि
मार्गांवरील भाड्यांची आखणी 
३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल :
                                                  


१. रिझर्वेशन सिस्टीम: मी यापूर्वीच्या लेखात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे.तो लेख नंतर ब-याच व्हॉटस ऍप ग्रूप्सवर माझ्या नावाविना बघायलाही मिळाला. या लेखाचीही तीच अवस्था होणार हे मी जाणून आहे.

सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चे रिझर्वेशन टाकणे म्हणजे एस. टी. साठी आत्महत्या ठरेल. स्लीपर बसमध्ये रिझर्वेशन न करता कुणीतरी ऐनवेळी येईल आणि आपण त्याला जागा देवू शकू ही अपेक्षा भाबडेपणाची आहे. नेहेमीच्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये पाहिजे तो बर्थ, पाहिजे ती जागा,  मिळणार नसली तर सध्या लोक दुस-या ट्रॅव्हल्सची त्याच मार्गावरची बस निवडतात हे एस. टी. ला माहिती हवेय. त्यामुळे सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीम मध्ये ब-याच सुधारणा त्यांना घडवून आणाव्या लागतील. याबाबत एस. टी. बरीच मागे आहे. जग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असताना ते तंत्रज्ञान नाकारून वाळूत तोंड खुपसून शहामृगी झोप घेण्यात एस. टी. मग्न आहे.

नुकत्याच झालेल्या महाड अपघाताची घटना घ्या. गाडीत जीपीएस असते आणि त्यांचे रियल टाईम मॉनिटरींग असते तर त्यांचा पत्ता लवकर लागला असता. एव्हढेच कशाला ? तिकीट यंत्रातून किती तिकीटे विकल्या गेलीत आणि त्या क्षणी गाडीत किती प्रवासी होते हे आजतागायत नक्की कळलेले नाही. आधुनीक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फ़ार पैसे लागत नाहीत. फ़क्त सजगता, आत्मीयता आणि कल्पकता लागते हे एस. टी. च्या अधिकारीवर्गाला कुणीतरी समजावून सांगा रे. आज बहुतेक खाजगी गाड्या जीपीएस चा वापर करून मधल्या थांब्यांवर चढणा-या प्रवाशांना एस. एम. एस. पाठवतात. ज्यात असलेल्या गूगल लिंकवरून आपण त्या गाडीचे नक्की ठिकाण नकाशवर बघून आपल्या घरून निघण्याची वेळ निश्चित करू शकतो. रात्री अपरात्री ह्याचा सर्वांनाच फ़ार उपयोग होतो. पण एस. टी. च्या हे गावीही नाही.

तुमच्या रिझर्वेशन साईटवर गेल्यावर लॉग इन करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशाला आपली सर्व माहिती पहिल्यांदा द्यावी लागते. का ? सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या "रेडबस" वर तर कुणीही बुकिंग करू शकतो. अरे. ज्याला जायचय त्याच्या कडून पैसे मिळून त्याला तिकीट मिळाल्याशी मतलब. बर रिझर्वेशन साईटवर स्लीपर बसेसच्या तरी सीटस नीट दिसणार आहेत का ? अजूनही परिवर्तन बसेसच्या त्या २ बाय २ की ३ बाय २ यात एस. टी. चाच गोंधळ आहे. आणि प्रवाशांना हवी ती सीट मिळण्याची शाश्वती नाही.



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?


मुळात ही साइट एव्हढी जडजंबाल आहे की माझ्यासारखा बसफ़ॅनही साधे शिरपूर ते नाशिक तिकीट बूक करू शकत नाही. दिवसाला कमीत कमी २० बसेस असताना. हे सुधारणार आहेत की नाही ? अशा पध्दतीच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चालू शकत नाही.

२. मार्गांचे नियोजन : शिवशाही बसेस यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मार्गांचे नियोजन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. नागपूर - पुणे मार्गावर जवळपास ४० खाजगी गाड्या आज रोज चालत  असताना त्यात महागड्या शिवनेरीने प्रवास कोण करणार ? पुणे - औरंगाबाद या ५ तासांच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसची खरच आवश्यकता आहे का ? स्लीपर कोच या मार्गावर आणल्यातही तर त्यांच्या एकतर निघण्याच्या वेळा अडनिड्या होणार किंवा पोहोचण्याच्या वेळा अडनिड्या होणार. रात्री ११ वाजता निघालेली गाडी भल्या पहाटे ४ वाजता प्रवाशांना मुक्कामावर सोडणार,  नाहीतर सकाळी ६ वाजता गंतव्य स्थानी जाऊ इच्छिणा-यांना रात्री १ वाजता बसमध्ये बसावे लागणार. दोन्ही वेळेला झोपेचे खोबरेच. दिवसा प्रवासासाठी स्लीपर कोच म्हणजे अडचणच होणार. मुंबई - औरंगाबाद मार्गावर पण या गाडीला प्रतिसाद लाभेल असे वाटत नाही कारण खाजगी गाड्यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धात्मक भाड्यांपुढे आपली एस. टी. टिकाव धरणार नाही. पुणे - चंद्रपूरचे उदाहरण ताजेच आहे.


यावर उपाय म्हणून एस. टी. ने टीयर टू शहरांचा प्राधान्याने विचार करावा. ज्या शहरांमध्ये चांगली प्रवासीसंख्या आहे पण ज्या शहरांना खाजगी ऑपरेटर्स सेवा द्यायला उस्तुक नसतात त्याठिकाणी एस. टी. ने शिवशाही सुरू केली तर प्रतिसाद मिळून फ़ायद्यात जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. उदा.

१. मुंबई / ठाणे - शेगाव :  मार्गे नाशिक - धुळे- जळगाव - खामगाव हा रात्रभरचा हा रूट फ़ायद्याचा ठरेल.


२. शेगाव - शिर्डी : मार्गे खामगाव - चिखली - जालना - औरंगाबाद - नेवासे हा रात्रभरचा मार्गही भाविकांसाठी फ़ायद्याचा ठरेल.


३. शेगाव - अक्कलकोट : मार्गे खामगाव - चिखली - जालना - बीड - कुंथलगिरी - येरमाळा - तुळजापूर  हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


४. शिर्डी - अक्कलकोट : मार्गे अहमदनगर - मिरजगाव - करमाळा - टेंभूर्णी - मोहोळ - सोलापूर हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


५. नागपूर - पंढरपूर : सध्याच्या मार्गावर निम आराम ऐवजी स्लीपर बस तुफ़ान चालेल.


६. नांदेड - नाशिक : मार्गे परभणी - जालना - औरंगाबाद हा मार्गही स्पर्धा नसल्याने चालायला हरकत नाही.


७. चंद्रपूर - नाशिक : मार्गे वणी - यवतमाळ - कारंजा - मेहेकर - चिखली - बुलढाणा - मलकापूर - भुसावळ - जळगाव - धुळे - मालेगाव. या मार्गावरपण सध्या स्पर्धा नाही.





आता यात ग्यानबाची मेख अशी आहे की वरील आणि वरीलप्रमाणे इतर मार्ग यशस्वी व्हायला हवे असतील तर मार्गावरचे थांबे कमी करण्याचे धोरण महामंडळाला पाळावे लागेल. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ मध्ये कमीतकमी थांबे घेतलेत तर प्रवाशांची झोपेची गरज पूर्ण होईल. शेगाववरून रात्री ९, ९.३० च्या सुमारास अक्कलकोटकडे निघालेल्या बसला खामगाववरून रात्री १० च्या आसपास प्रवासी घेतलेत की मधल्या चिखली, जालना, बीड च्या प्रवाशांची गरज नसावी. या सर्व प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी दिवसा चिकार गाड्या आहेत आणि रात्री या मार्गावरून जाणा-या इतर परिवर्तन सेवाही आहेत. खामगावनंतर थेट तुळजापूरला गाडी थांबवली तर भाविकांची मोठी सोय होईल. थोड्याशा फ़ायद्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवाशी महामंडळाला गमावून चालणार नाही. नागपूर - पंढरपूर बसलाही यवतमाळ नंतर जवळ जवळ तुळजापूरपर्यंत प्रवासी चढ उतारीचा थांबा नसावा. ममतादीदींनी आणलेल्या दुरांतो गाड्यांना आपण सुरूवातीला कितीही नाके मुरडली तरी आजही लांब प्रवासासाठी आपली पहिली पसंती दुरांतोंनाच असते. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी ही सेवा लोकप्रिय व्हायला हवी असल्यास मधले अनावश्यक थांबे टाळणे अत्यंत आवश्यक आहेत.




अर्थात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांच्या मूलभूत शारिरीक गरजा आणि चहा जेवण यांसाठी, चांगल्या सोयी असलेल्या हॉटेल्सची निवड महामंडळाने अगदी काटेकोर निकषांवर करावी. हा सर्व खाजगी गाड्यांचा वीक पॉइंट आहे. केवळ याच एका मुद्द्यावर प्रवासी आपल्याकडे वळवू शकतो हे महामंडळाने लक्षात घ्यावे. अतिशय कठिण निकष लावून आणि दर्जेदार सेवेची हमी घेऊनच या थांब्यांची निवड व्हावी. यात गलथानपणा झाला किंवा वैयक्तिक हितसंबंध आडवे आलेत तर सगळ्यांचाच तोटा आहे हे सर्व संबंधित अधिका-यांनी लक्षात ठेवायला हवे. आज खाजगीवाले नेमके हेच करू शकत नाहीत. याचा फ़ायदा आपण घ्यायला हवा.




३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल : आज जवळपास प्रत्येक डेपोत गाड्या धुण्याचे यंत्र आहे. त्याचा वापर झाल्याचे मात्र दिसत नाही. जवळपास ९० % गाड्या आतून आणि बाहेरून अस्वच्छ असतात. स्लीपर कोचला हे धोरण चालणार नाही. गाडी तिच्या गंतव्य स्थळी पोहोचल्यानंतार बाहेरून आणि आतून स्वच्छ करण्याची चांगली व्यवस्था असायला हवी. प्रवाशांना देण्यात येणारी अंथरूणे पांघरूणे यांचाही पुरवठा आणि दर्जा सतत चांगला राखावा लागेल. काही खाजगी सेवा हे सर्व करू न शकल्यामुळे हळूहळू प्रवाशांच्या मर्जीतून उतरत जातात आणि सातत्याने हा दर्जा सांभाळणारे प्रसन्न, सैनी, वर्मा सारखे ट्रॅव्हल ऑपरेटर्स गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा मार्केट शेअर सांभाळून आहेत याचा गांभीर्याने व्हावा.

मित्रांनो, आपली प्रेमाची एस. टी. टिकायला, वाढायला हवी म्हणून हा प्रपंच. आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर या एस. टी. ला संपवणा-या त्रुटी दिसत असताना त्या दाखवण्याचे काम आपण करणार नसू तर आपण एस. टी. प्रेमी म्हणून आपली वंचनाच करून घेतोय असे होईल. आपली एस. टी. टिकली, वाचली तरच आपण एस. टी. फ़ॅन्स म्हणून मिरवू शकू हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवेय. (हा लेख व्हॉटसऍप किंवा इतर सोशल मेडीयावर कॉपी करताना नावासकट कॉपी करावा ही नम्र विनंती. मूळ विचारकर्त्याला मिळू देत की त्याच श्रेय. उगाच उसनी विद्वत्ता मिरवायचा सोस कशाला न ?)                                                                                                                    - प्रा. राम प्रकाश किन्हीकर






1 comment:

  1. छान लेख . एस टी हा माझा ही मोठा आपुलकीचा विषय आहे

    जरा मुंबईहून पश्चिम महाराष्ट्रात ( सांगली, कोल्हापूर ) कडे ही एखादी स्लीपर पाठवा की ( हलकेच घ्या )

    ReplyDelete