Friday, January 22, 2016

मनाचे श्लोक - ५




मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठीलागी II १३ II 


खरेतर रावण हा केव्हढा (लौकिकदृष्ट्या) ऐश्वर्यसंपन्न विद्वान आणि पराक्रमी ! पण केवळ परस्त्रीच्या वासनेमुळे त्याने स्वतःचा विनाश ओढवून घेतला. स्वतःच्या मनाचे तर ऐकले नाहीच पण पत्नी, बंधू, प्रजाजन यांचेही न ऐकता आपल्यासोबत त्यांनाही विनाशाचे खाईत ढकलले. श्री समर्थ आपणास त्या उदाहरणावरून सावध व्हायला सांगताहेत. आज आपल्याकडे कितीही संपत्ती, सत्ता, सामर्थ्य असले तरी मन चांगले नसेल तर उद्या विनाश हा ठरलेलाच आहे. त्यामुळे मनाचा विचार करून मन शुद्ध ठेवून जगणे अतिशय महत्वाचे ठरते. 
श्री समर्थांनीच लिहून ठेवलेय की " यमाशी करूणा नाही ". कारण सर्वसत्ताधीश काळ हा कुणाकडूनही लाच घेत नाही, कुणासाठीही थांबत नाही आणि त्याचे काम सदासर्वकाळ चोख बजावत असतो. त्यामुळे आपल्या सत्तेचा, शक्तीचा, पैशांचा अहंकार काळापाशी चालत नाही. तेव्हा त्या्ची गती ओळखून सदाचरणात आयुष्य घालवावे हेच बरे.


जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळमुखी निवाला
महाथोर ते मृत्यपंथेचि गेले
कितीयेक ते जन्मले आणि मेले II १४ II 


भारतीय अध्यात्म शास्त्रांनुसार अनेकानेक योनींमध्ये जन्म घेउन आपण पुन्हा मानव देहाप्रत जन्म पावत असतो. या मानवी देहातच आपणास चांगले काय ? वाईट काय ? हे ओळखून आपले कर्म निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होत असतो. मनुष्यदेह (मानव जन्म) हा दुर्लभ मानला गेलेला आहे. हा जन्मात जर आपण आपल्या कर्मांद्वारे मुक्तीचा प्रयत्न करू शकलो नाही तर पुन्हा सगळ्या जन्माप्रत जाऊन पुढल्या मनुष्य जन्माची वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि पुढल्या जन्मात तरी आपल्याला मुक्तीची आठवण राहील, त्या मार्गावर चालण्याची स्फ़ूर्ती होईल याची काय खात्री ? म्हणून जे काही साध्य करायचेय ते याच जन्मात. 

पण आपण याचा खोल विचार न करता Soloman Grandy सारखे केवळ जन्मतो आणि मरतो. त्या Soloman Grandy  ने काय केले ?  अमुक  on Sunday, तमुक  on Tuesday. आणि सरतेशेवटी died on Saturday and buried on Sunday. And that is the end of Soloman Grandy. तसे करू नका हे श्री समर्थ आपणास कळकळीने सांगताहेत. आणि त्याच बरोबर कितीही मोठा माणूस असला तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे या जीवनाच्या क्षणभंगूरपणाची जाणीव श्री समर्थ आपणास करून देताहेत.


मना पाहता सत्य हे मृत्यभूमी
जितां बोलती सर्वही जीव मी मी
चिरंजीव हे सर्वही मानिताती
अकस्मात सांडूनिया सर्व जाती II १५ II 


या जगात मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि आपला प्रवास जन्मानंतर निरंतर मृत्यूकडेच होत आहे हे सत्य एकदा डोळ्यांसमोर सतत असल्यानंतर मनुष्याचा पापाचरणाकडचा कल कमी होतो. 

दोन कथा आहेत. एक संसारी माणूस एका खूप प्रसिद्ध आणि निस्पृह अशा साधूला भेटायला त्याच्या आश्रमात गेला. त्याच्याकडे जाऊन आपल्यासाठी संसारोपयोगी काही रहस्ये शिकता आली तर बरे,  या भावनेने तो गेला. त्याच्या कुटीत प्रवेश करतो तो काय ? त्याने बघितले की त्याच्या कुटीत केवळ तुटपुंजे वाटावे आणि रोजच्या अत्यावश्यक गरजाही पु-या होऊ शकणार नाहीत इतकेच सामानसुमान होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले " बाबाजी आपले इतर साहित्य कुठाय ? " साधू म्हणाला " तुझेतरी  इतर साहित्य कुठाय ? " तो म्हणाला " अहो, मी इथे पाहुणा म्हणून आलोय ना. मग ? " त्यावर साधू हसत उत्तरला " अरे बाबा, मी सुद्धा इथे पाहुणा म्हणूनच आलोय. " या पृथ्वीतलावर वावरताना पाहुणा म्हणून आलोय याची जाणीव ठेवून वावरले की आपलेपणाच्या जाणीवेचा आपसूकच विसर पडतो आणि पापाचरणाकडचा कल आपसूकच कमी होतो.

संत एकनाथ महाराजांची कथा आहे. एक गृहस्थ त्यांच्या शांत संसाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या खनपटीलाच बसला. महाराजांनी त्याला सांगितले " अरे, हे शांतपणाचे रहस्य वगैरे विचारण्यात वेळ घालवू नकोस. तुझी पत्रिका मी पाहिली आणि तुझा मृत्यू आजपासून बरोबर एका आठवड्याने आहे. तेव्हा आता निरवानिरव करून घे बाबा. "  तो मनुष्य घरी गेला. आता आठवडाभरात मृत्यू अटळ म्हटल्यावर त्याने शांतपणे सगळी निरवानिरव सुरू केली. सगळ्या नातेवाईकांना भेटला. आजवर काही चुका झाल्या असतील, दुःख दिले असेल तर माफ़ करा अशी क्षमायाचना केली. सगळी कर्जे चुकती केलीत. प्रेमळपणे पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांचा निरोप घेतला आणि बापुडवाणेपणे मृत्यूदिनाची वाट पहात बसला. सांगितलेल्या दिवशी पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून तो संत एकनाथ महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याला विचारले की बाबा, गेल्या आठ दिवसात किती वेळा राग द्वेष, कपट भांडणांची आठवण झाली ? तो म्हणाला महाराज " त्यांची कसली आठवण होतेय ? सतत मरण समोर दिसत असताना त्या क्षणभंगूर विकारांची संगत अजिबात नकोशी वाटली. " महाराज हसले आणि म्हणाले " अरे वेड्या. मग आम्हा संत मंडळींचेही तसेच आहे. आम्हाला नेहमी मृत्यूची आठवण असते आणि म्हणून हे क्षणभंगूर विकार नकोसे वाटतात. त्याची प्रचिती तुला यावी म्हणून हे मृत्यूचे खोटेच भाकीत मी आठवड्यापूर्वी केले. "


" मरणाचे स्मरण असावे. हरीभक्तीत सादर व्हावे. " हे श्री समर्थांनी लिहून ठेवलेय ते याच साठी.पण या सत्याचा जगरहाटीत विसर पडल्यावर आपण स्वतःला जणू काय इथे आपण कायम रहाणार आहोत असे मानतो आणि त्यादृष्टीने वागायला लागतो. पण काळाच्या सर्वशक्तीमानतेसमोर कुणाचेही चालत नाही आणि म्हणूनच त्याचे बोलावणे आल्यावर हातातली सगळी कामे टाकून जावेच लागते. इलाजच नाही.

 म्हणून या्च जीवनात उत्कर्षाचा उन्नतीचा मार्ग आपणच आपला साध्य केला पाहिजे. त्यासाठी आपले सदगुरू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील पण त्यावरून वाटचाल मात्र आपणच केली पाहिजे.


II जय  जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment