Tuesday, January 12, 2016

मनाचे श्लोक - ४




सदा सर्वदा प्रीती रामी धरावी
दुःखाची स्वये सांडि जीवी करावी
देहेदुःख ते सुख मानीत जावे 
विवेकी सदा सस्वरूपी भरावे II १० II 

मनुष्यमात्राला दुःख का भोगावे लागते यावर श्री समर्थांनी आणि इतरही तत्ववेत्त्यांनी खूप विचार करून ठेवला आहे. किंबहुना संताच्या कार्याचा जन्मच हे जगतातले दुःख पाहून त्याच्या निवारण्याच्या तळमळीतून झाला आहे. मनुष्यमात्राच्या "देह म्हणजे आणि म्हणजेच मी"  या भ्रामक समजुतीशी त्यांचे सगळे दुःख जोडल्या गेले आहे. देहाला दुःख झाले की आपल्याला दुःख होते पण त्याच बरोबर देहाशी आपण आपल्याला जोडले की जास्त दुःख वाटते. अपमान झाला, उपेक्षा झाली की याच देहबुद्धीमुळे संताप येतो, दुःख वाटते. श्री ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात देह हा एकदा प्रारब्धाच्या ताब्यात आहे हे ओळखले की मग "मी म्हणजे देह नाही" ही भावना दृढ होते. आणि मग देहाशी संबंधित सुखदुःखांची आपल्याला बाधा होत नाही. आपल्या सगळ्यांचा स्वकर्तृत्वाचा अहंकार येव्हढा जबरदस्त असतो की आपणच आपल्या आयुष्य़ातले सर्वेसर्वा आहोत अशी समजूत करून आपण घेतो.

"प्रभू रामचंद्र माझे स्वामी आहेत, सर्वेसर्वा आहेत. माझ्या आयुष्यातले सगळे बरे वाईट प्रसंग केवळ त्यांच्याच इच्छेने येत आहेत" ही भावना दृढ झाली की कसले दुःख आणि कसले सुख ?  या अर्थाने श्री समर्थ आपणा सर्वांनी श्रीरामांप्रती प्रिती करायला सांगताहेत त्यामुळे देहाचे दुःख आणि सुख यात आपण फ़रक करणार नाही. श्री ब्रम्हचैतन्य महाराज छान दृष्टांत देतात. " दोन मुली भातुकलीचा खेळ करीत होत्या. एकीने पाहुण्यांसाठी श्रीखंड पुरी केली आणि दुसरीने साधासाच गुळांबा केला. एकीचा गुळांबा जसा पोट भरायला उपयुक्त नाही तसा दुसरीचा श्रीखंड पुरीचा बेतही उपयुक्त नाही " आयुष्याकडे या समदृष्टीच्या विवेकाने पाहण्याची शिकवण आपल्याला श्री समर्थ देत आहेत.

जनी सर्वसूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनि पाहे
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले II ११ II 

या जगात सुखी माणसाचा सदराच नाही. जगात सर्वात सर्व अर्थाने सुखी असा कुणीही नाही. सर्वसुखी संतमंडळीच असतात. श्री समर्थ आपणा सर्वांना त्या समस्त सर्वसुखी माणसांच्या (संतांच्या) सौख्याचा धांडोळा घ्यायला सांगताहेत. ते सुखी आहेत कारण त्यांनी आपले सुख श्रीरामांसारख्या शाश्वत गोष्टींशी निगडीत केलेले आहे. आपण आपली सुखाची कल्पना भौतिक जगतातल्या नश्वर गोष्टींशी निगडीत केली तर शाश्वत सुख कसे मिळेल ? देहाशी संबंधित जी सुखदुःखे असतात ती आपल्या पूर्व कर्मांना अनुसरून असतात. चांगली कर्मे केली तर सुखस्वरूप चांगलेच फ़ळ प्राप्त होईल आणि वाईट कर्मांमुळे वाईट फ़ळांचा स्वीकार करावाच लागेल हा कर्माचा सिद्धांत एकदा स्वीकारला की मनाला शांती लाभेल.

मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेदुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. II १२ II 

म्हणूनच श्री समर्थ आपणा सर्वांना विवेकाने विचार करून ही देहबुद्धी सोडायला सांगताहेत. "मी देह नाही" यावर दृढ विश्वास बसला की मग मनातल्या शोक, चिंता, दुःखांना पूर्णविराम मिळेल आणि मुक्ती मुक्ती म्हणजे तरी दुसरे काय ? "पुनरपी जननम पुनरपी मरणम" च्या फ़े-यातून सुटका तर आहेच पण ज्या विदेही पुरूषाला शोक चिंता उद्वेग, दुःख यांची जाणीवच नाही त्याला आयुष्यात मुक्तीच मिळाली असे म्हणावे लागेल. 

 II जय  जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment