Friday, March 27, 2015

मजवीण तू मज...



समर्थांच्या अनेक रचनांपैकी ही माझी एक अत्यंत आवडती रचना. चौपदीत प्रभू रामचंद्रांकडे मागणी करताना समर्थ " कोमल वाचा, विमल करणी,प्रसंग ओळखी, बहुजनमैत्री, बहुत पाठांतर, संगीत गायन, आलाप गोडी, सावधपण, सज्जनसंगती " वगैरे सगळ मागतात. पण त्यातल शेवटच्या चौपाईतल मागण मला फ़ार आवडून जात. " मजवीण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम "

परमेश्वराच्या आणि भक्ताच्या नात्यातली उत्कटता म्हणजे आत्मनिवेदन आणि अनन्यशरण जाणीव. " भगवंता मला दुसरं कुणी नाही फ़क्त तूच आहेस." ही जाणीव भक्ताच्या मनात प्रगाढ झाली की आपोआपच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, नेत्र पाझरायला लागतात. आजवरचे सगळे प्रसंग आठवून तोच आपला सांगाती होता ही खूण मनोमन पटते आणि जीवनाचा बहुतांशी काळ नश्वर सुखाच्या मागे धावण्यात आपण व्यर्थ घालवला याच्या जाणीवेने दुःख होते.

पण याही पेक्षा उत्कट अवस्था या चौपदीत समर्थांची झाली आहे. प्रभू रामचंद्रा मला जगाच्या दृष्टीने या सगळ्या चांगल्या, पावन आणि सात्विक वृत्तीची वाढ करणा-या गोष्टी तर तू देच पण त्याहूनही तुझी भक्ती करत असताना कुणीतरी "मी" ही भक्ती करतोय याची जाणीव तू पुसून टाक. तुझ्या भक्तीआड माझी मी पणाची जाणीव अजिबात येउ देउ नकोस. मी नाहीच फ़क्त तूच आहेस अशा प्रकारचा अनुभव मला दे. ही भक्तीची उत्कटता मला दे.

"संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले" असं म्हणतात ते किती खरं आहे नं ? माझ्या ज्ञानोबामाउलीने एका विरहिणीत " भेट देउ गेले तव मी ची मी एकली" हा अनुभव आपणा सर्वांसमोर विशद केला होता ना ? त्या पांडुरंगाला भेटायला जाणा-या भक्ताला हा अद्वैतानुभव आला आणि समर्थ तेच श्रीरामांना मागताहेत 
"मजवीण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम"

आपण सर्वही भक्तीचा हा मार्ग चालताना या उत्कटतेप्रत पोहोचू. स्वतःला भगवंतासमोर सादर करताना " मै नही, तू ही " ही उत्कट अवस्था सगळ्यांना प्राप्त होवो हेच त्या श्रीरामरायाला साकडे घालतो.


- मन्मथनाम संवत्सर, श्रीरामनवमी शके १९३७ (२८/०३/२०१५)

Saturday, March 21, 2015

हिशेब गतवर्षीचा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला काय काय कमावलं ? काय काय गमावलं ? याचा सहज हिशेब आज महाविद्यालयातून घरी परतताना करत होतो. (गाडीच्या प्रवासात मी माझा अगदी एकटा असतो त्यामुळे तुकोबांच्या उक्तीनुसार "आपुलाची (सं)वाद, आपणासी" अशी नेहेमी अवस्था होत असते. अनेक चांगल्या कल्पना, जीवनाविषयी विचार अशा छान एकांतातच आकाराला येतात.)

१. या संवत्सरात गमावलेल्या गोष्टींपेक्षा कमावलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे.

२. गेल्या दोन तीन वर्षांपासून जीवनाला अगदी थेट भिडल्यामुळे जीवन नावाचा शिक्षक त्याचे धडे देतो आहे.

३. सगळेच धडे सुखद असतातच असे नाही पण त्यांना वैतागण्यापेक्षा त्यांनी काय शिकवलय हे यावर्षी बघायला शिकलो.

४. थोडा अलिप्तपणा धरून आपल्याच जीवनाकडे बघायला शिकलोय. (हा प्रवास साधारण २००९ च्या आसपास श्री. विवेकजी घळसासींच्या प्रवचनांनंतर सुरू झालाय तो आता फ़लदायक मुक्कामावर येतोय. हे मला वाटतं की एका चांगल्या प्रवचनकाराच, निरूपणकाराच खरं यश आहे. अंतरंगात बदल घडवता येणे हीच मोठी सिद्धी आहे. आणि त्यादृष्टीने विवेकजी सिद्धीप्राप्त आहेत.)

५. भौतिकदृष्ट्या वर्ष समाप्तीच्या आसपास एक समाधानाची जाणीव आहे. आपण वर्षांनुवर्षे जोपासलेल्या आणि वृद्धींगत करत आलेल्या गुणसमुच्चय्याची चांगली दखल कुठेतरी घेतली जातेय, आपला प्रामाणिकपणा हा एक अवगुण म्हणून न बघितला जाता त्याची किंमत होतेय, आपल्या आपापल्या कार्याप्रतीच्या निष्ठा या वेडेपणा म्हणून हिणवल्या जात नाहीत या सगळ्या गोष्टी खरोखर भौतिकदृष्ट्या सुखावणा-याच.

पुढील मन्मथनाम संवत्सरही मला आणि माझ्या सर्व मित्र, आप्तेष्टांना असेच सुखाचे, समाधानाचे आणि अभिवृद्धीचे जावो ही सदगुरूंकडे प्रार्थना आणि शुभेच्छा. (पहिल्यांदा मी मलाच शुभेच्छा दिल्यात कारण "अपना खुदका नाम लेकर कभी कभी खुदकोभी आवाज दे देनी चाहिये भाई.")

Wednesday, March 18, 2015

एका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.

७ फेब्रुवारी २०००. 
मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत.

प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभागी असल्याने अस्मादिक धोतर आणि नेहरू शर्ट अशा पारंपारिक मंगलवेषात.

चंद्रपूरवरून देशपांडेंकडील मंडळी बघायला येणार असल्याने मी शर्ट पॅण्ट असा पोषाख करावा हा माझ्या आईचा आग्रह मी न जुमानलेला.

नवर्‍या मुलाची आर्थिक स्थिती, कौटुंबिक जबाबदार्‍या, रुप आणि रुबाब या सगळ्या गोष्टी लग्नाच्या बाजारात उणी बाजूकडील होत्या.

बघण्याचा रीतसर कार्यक्रम झाला. दिवाणखान्यात (आमची तत्कालीन समोरची खोली. त्याला दिवाणखाना म्हणणे म्हणजे सशाला हत्ती म्हणण्यापैकीच आहे. पण मराठी भाषा वापरायची म्हटल्यावर.....) नाथबीजेला प.पू. महाराजांकडे उत्सवाला आलेली भक्त मंडळी, आई, धाकटा भाऊ आणि देशपांडेंकडील मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत रीतसर चहापान वगैरे झाले. मुलीला माझी आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती नीट माहिती आहे की नाही ? हा प्रश्न माझ्या मनात तसाच अनुत्तरीत होता. बरं उत्सवाच्या धामधुमीत निवांत बोलण्याजोगा वेळ आणि जागा दोन्ही नव्हत्या.

मी थोडा धीर धरून मुलीशी बोलण्यासाठी तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी मागितली. देशपांडेंनी ती दिली. जवळच (घाटे दुग्ध मंदीर, महाल नागपूर) इथे आम्ही बोललोत. मी कसलाही आडपडदा न ठेवता माझा तत्कालीन (तुटपुंजा) पगार, माझ्यावरील कौटुंबिक जबाबदार्‍या याबद्दल तिला प्रांजळ आणि स्पष्ट कल्पना दिली आणि आम्ही परतलो.


तासाभरातच मुलीकडल्यांचा होकार घेऊन आमच्या सासुबाई घरी आल्यात. प.पू. मायबाईंच्या आशिर्वादाने लग्ननिश्चिती झाली.


त्यावेळेसचे नवथर राम आणि वैभवी आता नंदबाबा आणि यशोदामैय्यांच्या रूपात बदलले आहेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. काळ बदललाय. जबाबदार्‍या बदलल्यात. बदलला नाही तो फक्त आमच्या गुरू माऊली चा आमच्यावरचा आशिर्वाद.