Tuesday, March 25, 2014

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

नोव्हेंबरच्या अखेरीच्या आठवड्यात हिवाळी सुट्टी घेतली. चि. मृण्मयीच्या शाळेतून कशीबशी आठवडाभरासाठी सुट्टी मिळवली आणि पहिल्या वहिल्या दक्षिण प्रवासासाठी सज्ज झालो. नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते रामेश्वरम ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते तिरूवनंतपुरम, तिरूवनंतपुरम ते तिरूपती, तिरूपती ते चेन्नई आणि चेन्नई ते नागपूर असा ८-९ दिवसांचा प्रवासाचा बेत होता. त्यातील नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, तिरूवनंतपुरम ते तिरूपती आणि चेन्नई ते नागपूर अशी रेल्वे प्रवासाची आरक्षणे झाली होती. थांबण्याची आणि इतर प्रवासाची व्यवस्था ऐनवेळी बघू म्हणत आम्ही निघणार होतो.

२९/११/२००८ रोजी नागपूर ते चेन्नई अशी तामिळनाडू एक्सप्रेसची आरक्षणे केलेली होती. या गाडीविषयी मला पूर्वापार फ़ार आकर्षण. चंद्रपूर स्थानकात न थांबता ऐटीत रोरावत निघून जाणारी, ताडाळीच्या फ़ाटकात इटारसी शेडच्या दोन दोन डिझेल एंजिनांच्या मागे झुपकन निसटणारी, लाल पिवळ्या आकर्षक रंगसंगतीच्या डब्यांची (पूर्वीच्या काळी), आणि काळाबरोबर थांबे फ़ार न वाढलेली ही गाडी अत्यंत मस्त  आहे. आजही नागपूर ते चेन्नई या १०९० किमीच्या प्रवासात फ़क्त बल्लारशाह, वारंगल आणि विजयवाडा हे तीनच थांबे ही गाडी घेते.

शनिवार २९/११/२००८.

महाविद्यालयातून घरी आलो. पटापट जेवलो. गाडी उशीरा धावत असल्याचे वर्तमान आंतरजालावरून बघितले. दुपारी १४.२० ला निघणारी गाडी जवळपास १ तास उशीरा धावत होती. न जाणो, एखादे वेळ भोपाळ ते नागपूर या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात वेळ भरून काढेलही म्हणून दुपारी १ वाजताच घरून निघालो. चि. मृण्मयी तर उत्साहात साडेबारा वाजल्यापासूनच तयार होऊन पाठीवर छोटी सॅक लावून बसली होती. प्रवासात कपडे मोजके घ्यायचे आणि संधी मिळाली की धूवून इस्त्री करून वापरायचे असे ठरल्यामुळे सामानाचे वजन मर्यादित झाले होते. (अतिरिक्त सामान घेतल्यामुळे झालेल्या फ़जितीच्या गजाली नंतर कधीतरी.) तसही स्टेशनवर वेळ काढणे हा माझ्यासाठी  प्रश्न नसून ती एक संधी असते.





चि . मृण्मयीची प्रवासाची जय्यत तयारी

गाडी उशीरा धावतेय हे माहिती असूनही आम्ही लवकरच म्हणजे १३. ४० वाजताच स्थानकावर पोहोचलो. फलाट  क्र. २ वरून तामिळनाडू एक्सप्रेस जाते हा नेहेमीचा अनुभव. तिथे सगळा सावळा गोंधळच होता. दुपारी १२. ३० वाजता चेन्नई ला जाणारी जी . टी . एक्सप्रेस  अजूनही गेलेली नव्हती. २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट  सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या उशीरा धावत होत्या.

नागपूर रेल्वे स्थानकावरील काही क्षणचित्रे.



१) फलाट ५ वर ८०३० हावडा-कुर्ला एक्सप्रेस उभी होती. भारतीय रेल्वेच्या लेकुरवाळ्या गाड्यांमध्ये हिची गणना होते. हावडा शेडचे तिचे एंजिन २२२७७ WAP ४ निमूट बाजूला उभे होते आणि एक नवीनच सर्वसाधारण वर्गाचा डबा गाडीला जोडला गेला .



२) पुणे शेडचे डिझेल एंजिन ११२२४ WDM ३D मोकळ्या रांगांमध्ये  निपचित पडून होते. संध्याकाळी १८.३० वाजता इथून निघणाऱ्या नागपूर-पुणे गाडीची  वेळ होईस्तोवर बिचारे  कालच्या झोपेची थकबाकी गोळा करीत असावे. 


दरम्यान चि. मृण्मयी कंटाळली . फ़लाटावर तशीही गर्दी नव्हतीच. आम्ही आमचे सामानाचे डाग एका निवांत जागी ठेवलेत आणि कन्यारत्नाला आणि तिच्या आईसाहेबांना बसायला जागा करून दिली .


३) बरोबर १३. ५५ ला (जवळपास दीड तास उशीरा)  २६१६ अप जी. टी. एक्सप्रेस फलाट २ वर आली. २२२९८ हे इरोड शेड चे WAP  ४ एंजिन तिला ओढत होते. जीटी च्या डब्यांची स्थिती याप्रमाणे.

गार्डाचा डबा-जनरल-जनरल-एच.ए १-ए १-ए २-बी १-बी २-एस १-एस २-एस ३-भोजनयान-एस ४-एस ५-एस ६-एस ७-एस ८-एस ९-एस १०-एस ११-एस १२-जनरल-जनरल-गार्डाचा डबा-पार्सल डबा. (एकूण २५ डबे)
(एच ए.१ = वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, ए १ आणि ए २ = वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, बी १ आणि बी २ = वातानुकुलीत त्रिस्तरीय शयनयान )

४) २६१६ जीटी ने १४.०८ ला प्रस्थान केले आणि १४.११ ला विरुद्ध बाजुने २६१५ (चेन्नई-नवी दिल्ली) जीटी नागपुरात आली. ही मजा रोज २६२१ तामिलनाडू आणि २६२२ तामिलनाडू एक्सप्रेसच्या बाबतीत नागपूरला होते. नागपूर ते नवी दिल्ली हे अंतर १०९० किमी तर नागपूर ते चेन्नई अंतर १०९५ किमी. म्हणजे नागपूर हे दिल्ली-चेन्नईचा मध्यबिंदू. दोन्ही बाजुंनी तामिलनाडू एक्सप्रेस रात्री २२.३० ला निघतात आणि नागपूरला दुस-या दिवशी दुपारी १४.१० वाजता येतात आणि आपापल्या गंतव्य स्थळी तिस-या दिवशी सकाळी ०७.३० वाजता पोहोचतात. गंमतच आहे. आज जी.टी. एक्सप्रेसला उशीर झाल्याने तिने तामिळनाडू एक्सप्रेसची जागा घेतली होती.

५) आम्हाला स्टेशनवर निरोप द्यायला महाविद्यालयातील माझे दोन तरूण सहकारी प्रा. हरीओम खुंगर आणि प्रा. कु. दिशा खंडारे आलेले होते. मग त्यांच्यासोबत एक फोटो सेशन झाले. हरीओम हा माझ्यासारखाच रेल्वेप्रेमी असल्याने तो असेपर्यंत वेळ वेगवेगळ्या गाड्या बघण्यात छान गेला.


हा आम्हा प्रवासी मंडळींचा फोटो. प्रा. किन्हीकर, सौ. किन्हीकर आणि चि. मृण्मयी किन्हीकर. प्रवासात कॆमेरा आणि डायरी हा आम्हा सर्व रेल्वे प्रेमींच्या तयारीचा अविभाज्य भाग असतो 
                                     

आणि हा फोटो चि. मृण्मयीने काढलेला आहे.

६) दरम्यान इतर फ़लाटांवर २८१० हावडा-मुंबई मेल, २९६८ जयपूर-मद्रास एक्सप्रेस, २४४१ बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, २८४३ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, २७१३ हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस, २१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस यांची ये जा सुरू होतीच. सगळ्या गाड्यांना लालुप्रसादांच्या कल्पनेतले साइड मिडल बर्थस जोडलेले होते. प्रचंड गैरसोयीचे हे बर्थस नंतर काढल्या गेलेत. एका "तुघलकी" योजनेचा योग्य तो शेवट झाला.


आंध्र प्रदेश एक्सप्रेस. नाम फ़लक वैशिष्ट्यपूर्ण. त्यात निळ्या पट्टीने झाकलेल्या भागात कुठल्यातरी गावचे नाव असणार. ते गाव-हैद्राबाद आणि हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस रेक्स शेअर करीत असणार. बहुतेक विशाखापट्टणम.

७) दरम्यान काही मालगाड्यांची ये जा सुरू होतीच. त्यातले काही दुर्मीळ योग टिपलेत.



लुधियाना शेडचे ह्या प्रकारातले एंजिन या रंगसंगतीत फ़ार क्वचित दिसते. रेल्वे प्रेमींमध्ये ही रंगसंगती "बार्बी डॉल रंगसंगती" म्हणून प्रसिद्ध आहे.


इरोड (तामिळनाडू) शेडचे ह्या प्रकारातले हे दुर्मीळ एंजिन. या रंगसंगतीत तर फ़ारच दुर्मीळ.

८) दरम्यान १६.३५ झालेत. आमच्या गाडीची उदघोषणा होत होतीच. " थोडेही समय में प्लॅटफ़ार्म नं २ पे आयेगी " हे ऐकून ऐकून कंटाळा आला. गाडी ७०-८० किमी दूर असल्यापासूनच उद्घोषणा सुरू करतात की काय ? असे वाटून गेले. दरम्यान आमची सख्खी सखी १०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस नागपुरात दाखल झाली. माझ्या एकूण  प्रवासापैकी एक तृतीयांश प्रवास मी ह्या गाडीने केलेला आहे. नागपूर ते कराड या अभियांत्रिकीच्या ४ वर्षातली ही आमची सोबती.

९) शेवटी १६.४० वाजता उत्तरेच्या टोकाला बहुप्रतिक्षित व WAP ४ एंजिनाचा लाल ठिपका दिसायला लागला. हळूहळू तो मोठा मोठा होत आमच्या जवळून जात थांबला. प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला, उशीरा का होइना, सुरूवात झाली होती. दुस-या दिवशी मदुराई ला जाणारी आमची वैगाई एक्सप्रेस दुपारी १२.३० ला होती त्यामुळे तसे टेन्शन नव्हते.


इरोड शेडचे २२६६५. इरोड शेड हे त्यांच्या एंजिन नंबरांच्या बाबतीत पझेसिव्ह आहे. २२२२२, २२५५५, २२६६६, १११११ हे सगळे स्पेशल नंबर्स त्यांच्याकडे आहेत.

प्रवास: सविस्तर

एंजिन क्र. २२६६५ द. रे. इरोड शेड WAP ४

कोच क्र. ०६०२७, द. रे.,  एच. ए. १, वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, केबीन ए
इंटिग्रल कोच फ़ॆक्टरी, मद्रास येथे दि. १४/१०/२००६ रोजी बनविण्यात आलेला कोच.


कोचच्या अंतर्गत पॅसेजमधील सजावट.


हिवाळ्यात प्रवास करताना ब-याच जणांचा प्रश्न असतो. " हिवाळा असताना ए.सी. कशाला ? " त्याचे हे उत्तर. आतील तापमान हिवाळ्यातही १९ अंशापेक्षा खाली जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. बाहेर कदाचित रात्री तापमान ५ अंश ते १० अंश असू शकेल. त्यामानाने आत उबदार असेल. आणि ए.सी. प्रवासाचा सगळ्यात मोठा फ़ायदा म्हणजे आवाज, धूळ इत्यादी नसल्याने प्रवासाचा थकवा कमी होतो.










आम्ही आमच्या केबिनमध्ये स्थानापन्न झालो आणि १६.५६ ला गाडी हलली. अजनी स्टेशनला सिग्नल नसल्याने १ मिनीटांकरिता थांबून मग वेग घेतला. आमच्या केबिनमध्ये आमच्या तिघांशिवाय आमचे सहप्रवासी एक सदगृहस्थ होते. चेन्नई दूरदर्शनचे सहसंचालक होते. दिल्लीला कुठला तरी रिफ़्रेशर कोर्स करून परत कामावर निघाले होते. ( त्यांनी खरंतर नावही सांगितले होते. पण गडबडीत लक्षात राहिले नाही.) चि. मृण्मयी बसल्या क्षणापासूनच प्रवासाचा पूर्ण आनंद घेण्यात मग्न झाली. केबीनमधल्या टेबलावर चित्रकलेची वही काढून चित्रे काढण्याचा घाट तिने घातला. दरम्यान कोचचा मदतनीस आला आणि स्वच्छ अंथरूणे व पांघरूणे आम्हाला देऊन निघून गेला. अर्थात भारतातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा एका गाडीत सगळ्यात वरच्या वर्गात आम्ही प्रवास करीत होतो त्यामुळे सगळ्याच गोष्टी सर्वोत्तम मिळायला हव्यात ही आमची अपेक्षा अवास्तव नव्हती.

सिंदी रेल्वे पर्यंत (४६ किमी) गाडीने ब-यापैकी वेग पकडला होता पण पुढे पाठवलेल्या मालगाडीने घोटाळा केला. सिंदीत आम्हाला २ मिनीटांसाठी थांबावे लागले. 

मग मात्र तामिळनाडू एक्सप्रेसने तिचे खरे रंग दाखवायला सुरूवात केली. पुढल्याच स्टेशनवर (तुळजापूर जि. वर्धा) त्या मालगाडीला खाडखाड धूळ चारत आम्ही मार्गक्रमू लागलो. सेवाग्राम १७.५९ ला आलो. नागपूर ते सेवाग्राम हे ७६ किमीचे अंतर आम्ही १ तास ३ मिनीटांत कापले होते.  न थांबता दक्षिणेकडे जाणा-या वळणावर गेलो. रेल्वे प्रेमींचे हे वळण खूप आवडते आहे. आमच्या ग्रूपमध्ये या वळणाचे अक्षरश: शेकड्यात फ़ोटो आहे. संपूर्ण गाडी या वळणावर दृष्टीगोचर होत असते.

हिंगणघाट वगैरे झपझप कापून चंद्रपूरलाही (वेळ १९.२७. १९२ किमी अंतर २ तास ३१ मिनीटांत. थोडक्यात मुंबई-पुणे, २ तास ३१ मिनीटांत) न थांबता थेट पहिल्या अधिकृत थांब्यावर (बल्लारशाह) आम्ही थांबलो तेव्हा संध्याकाळचे १९.३८ झालेले होते. मध्य रेल्वेचा कर्मचारीवर्ग बदलून इथे द.म. रेल्वे चा कर्मचारी वर्ग आला. आम्हीही शिदो-या सोडून जेवण करून घेतले. १२ मिनीटांनी १९.५० ला गाडीने बल्लारशाह सोडले. थोडावेळ दारापाशी उभा राहिलो. बल्लारशाह नंतर लगेचच वर्धा नदीच्या पुलावरून आमच्या मामांचे शेत दिसते. लहानपणी शेतात हुरडा खायला गेल्यानंतर तिथल्या मचाणावर चढून दूरवरच्या गाड्या बघणे हा आमचा छंद असायचा. आज गाडीतून शेत दिसतय का हा नॊस्टालजिया जपत बाहेर बघत होतो. पण किर्र अंधार पडला होता त्यामुळे हा बेत सफ़ल झाला नाही.

रात्री नेहेमीप्रमाणे ९-९.३० लाच झोपी गेलो. सहप्रवासी भला होता. त्यानेही केबिनचे दिवे मालवायला कां कूं केले नाही.
रात्री वारंगल येऊन गेले असेल. आमची झोप मोडली नाही. पहाटे पहाटे गाडी ब-याच वेळ थांबली होती. खिडकीचा पडदा बा्जूला करून पाहीपर्यंत गाडी हलली. विजयवाडा स्टेशन होते आणि आनंददायी बाब म्हणजे नागपूरवरून आमच्या डोळ्यांसमोरून आमच्या जवळपास तासभर आधी निघालेल्या २९६८ जयपूर-चेन्नई सुपर एक्सप्रेसला आम्ही ओव्हरटेक करीत होतो. विजयवाड्याला त्या गाडीला बाजूला काढून आम्हाला प्राधान्य मिळालेले होते.

भारतीय रेल्वे हे जसे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे तसेच ते प्रांतवादाचेही आगर आहे. लुधियानाचे एंजिन कोची ला आणि वडोदरा चे एंजिन मालदा टाउन ला जसे सापडते तसेच आपल्या विभागात आपल्या गाड्यांना प्राधान्यक्रम देण्याची वृत्तीही सर्वत्र बघायला मिळते. मुंबई ते नागपूर हा मध्य रेल्वेच्या अखत्यारीतला प्रवास अगदी दिमाखात प्राधान्याने करणारी विदर्भ एक्सप्रेस नागपूरच्या पुढे दक्षिण पूर्व रेल्वेच्या ताब्यात गेल्यावर गोंदियापर्यंत बापुडवाणा प्रवास करते. जयपूर-चेन्नई सुपर ही भोपाळपर्यंत अगदी राणी असते. नंतर मात्र तिचे संस्थान खालसा होते. हे प्रकार सर्वत्रच अनुभवायला येतात.







रविवार ३०/११/२००८.

सकाळी आमच्या केबीनमधली सर्व प्रवासी मंडळी जागी झाली तेव्हा गाडी गुडूरजवळ पोहोचली होती. पेन्ट्री कार मधून इडली सांबारचा नाश्ता आला. वर चहा ढोसत आम्ही जरा फ़्रेश झालोत. 




गुडूरनंतर मात्र गाडीला फ़ारसा वेग घेण्याची संधी मिळाली नाही. "गुमीडपुंडी" या मजेशीर नावाच्या स्टेशननंतर चेन्नईची लोकल वाहतूक सुरू झाली होती.





आणि सरतेशेवटी ज्या स्टेशनविषयी खूप वाचले होते, ऐकले होते. त्या चेन्नई सेंट्रल स्टेशनला आम्ही पोहोचलोत. सकाळचे १०.०४ वाजले होते. नियोजित वेळेपेक्षा २ तास ३४ मिनीटे उशीरा. सरासरी वेग ६३.९१ किमी प्रतीतास. अतिशय चांगला. स्टेशनच्या आधीच या "जेम्स बॉण्ड" २२००७ साहेबांनी स्वागत केले.


चेन्नईला बाहेर आलो. स्टेशनच्या जुन्या, गॊथिक शैलीतल्या इमारतीचा फ़ोटो काढला.


आटो रिक्षा स्टॆंडपर्यंत आमचे सहप्रवासी (भला माणूस) सोबत होते. त्यांनी तामिळीतून रिक्षावाल्याशी बोलून ३० रूपयांत चेन्नई एग्मोर स्टेशनपर्यंत रिक्षा ठरवून दिला. (परतीच्या प्रवासात चेन्नईच्या रिक्षांचा आम्हाला "चांगलाच" अनुभव आला. ५-७ किमी प्रवासासाठी ७० ते ८० रूपये आम्ही मोजलेत) आमची गाडी दुपारी १२.३० ला चेन्नईवरून मदुराई साठी एग्मोर स्टेशनवरून जाणार होती. प्रवासाचा पहिला टप्पा तर खूप छान आणि आनंदात पार पडला होता.





चेन्नई शहर बस सेवेतल्या काही सुंद-या. रविवार असल्याने गर्दी तशी नव्हती. रस्ते ब-यापैकी मोकळे होते. चेन्नईचे प्रथम दर्शन, निवांतपणामुळे मला आवडले.

(क्रमशः)

Wednesday, March 19, 2014

दक्षिण दिग्विजय : पूर्वरंग

माझ्यातल्या प्रवासी पक्षाच्या पंखांना बळ देण्यात माझ्या दिवंगत वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. १९७८ मध्ये मी अगदी पहिल्या वर्गात असताना नागपूर ते चंद्रपूर बस प्रवासाचे वेळी त्यांनी एस. टी. बस वर लिहिल्या जाणा-या म.का.ना., म.का.दा., म.का.चि. इत्यादींचे अर्थ समजावून सांगितले होते. (त्याकाळी औरंगाबाद कार्यशाळेत तयार होणा-या बसेसवर म.का.चि. असे लिहीले असायचे. म.का.औ. लिहीण्याची सुरूवात ८० च्या दशकात झाली. चि.= चिकलठाणा) दरवेळी एखाद्या नवीन जागी जायचे असेल तर त्यांची हौस दांडगी असायची. त्याकाळच्या तुटपुंज्या परिस्थितीतही त्यांनी आमच्या इच्छा आकांक्षांच्या वारूंना लगाम घातले नाहीत की आमच्या गगनभरारीचे पंख छाटले नाहीत.

मला आठवतय १९७८ च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्या वर्गात (वय वर्षे ६), माझा धाकटा भाऊ चि. महेश (वय वर्षे ३) आणि सगळ्यात धाकटा चि. श्रीकांत (वय ० वर्षे ८ महिने) आमच्या आई आणि दादांसोबत (माझे वडील) एका मोठ्या प्रवासाला निघालो. आमच्या सोबत ती. दादांच्या शाळेतले त्यांचे सहकारी श्री. देशपांडे (कुटुंबासहित) व श्री टोपले (एकटेच) होते. त्याकाळी उपलब्ध असलेल्या प्रवासाच्या आणि निवासाच्या एकंदर सोयी सुविधांचा विचार करता हा प्रवास, त्याचे नियोजन व त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने आमच्या दादांनी केली त्याचा खूप मोठा ठसा माझ्यावर उमटला आहे. त्या प्रवासाने माझा प्रवासी पक्षाचा पिंड घडला. मी लहान होतो तरीपण ती. दादांनी मला या नियोजनात आणि प्रवासातल्या खूप गोष्टींमध्ये सहभागी करून घेतले होते. त्याची पुसटशी काही चित्रे.

१. नागपूरवरून प्रस्थान तत्कालीन नागपूर-दादर एक्सप्रेस ने होते. (आताची १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस). एक्सप्रेस गाडीत बसायचा हा माझा तरी पहिलाच अनुभव. शयनयान वर्गात आमची तिकीटे होती. रात्री झोप न येता उत्सुकतेपोटी प्रत्येक स्टेशनावर जागे होउन बाहेर बघण्याच्या माझ्या प्रयत्नांना आरडाओरड्याची साथ होतीच. रात्री १० वाजून १० मिनीटांनी ही गाडी नागपूरवरून निघायची आणि डबे निळ्या रंगातले (खिडकीच्या वरील भागावर पिवळ्या पट्ट्याचे) होते एव्हढे आठवतेय. त्यावेळी शयनयान डब्ब्यांमध्ये बर्थसना कुशन्स नव्हते. साधी लाकडी बाकडीच बर्थ म्हणून असायची. (शयनयान डब्ब्यांना काथ्याची व रेक्ज़ीनची कुशन्स मधू दंडवते रेल्वेमंत्री असल्याच्या काळापासून सुरू झालेली होती. १९७९ पासून). वर्धा शेडचे कोळसा एंजिन गाडीला लागायचे.
सकाळी ६ च्या सुमारास भुसावळ स्टेशनवर कोळसा एंजिन बदलून इलेक्ट्रीक एंजिन लागण्याच्या सोहोळ्याला इतर अनेक लोकांप्रमाणे आम्हीही गेलो होतो. इलेक्ट्रीक एंजिन बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग.

२. मनमाडला आम्ही साधारण सकाळी १० च्या सुमाराला पोचलो. तिथून शिर्डीसाठी जायला गाडी बदलायची होती. मनमाड स्टेशनवर जवळपास दोन अडीच तासांचा मुक्काम झाला. काचीगुडा कडे जाणारी छोटी गाडी तिथल्याच फ़लाटांवर बघायला मिळाली. (काचीगुडा म्हणजेच हैद्राबाद हे उमगायला १९९२ उजाडावे लागले.) मनमाड स्टेशनला बाहेर जाउन शिर्डीकडे जाणा-या बसेस, खाजगी वाहने यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला असल्याचे स्मरते. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्याने प्रस्ताव बारगळला.

३. मनमाड ते कोपरगाव हा प्रवास मनमाडवरून दौंडकडे जाणा-या पॆसेंजर गाडीने झाला. कोळसा एंजिनाची ठिणगी उडून डोळ्यात गेल्याने सुजलेला डोळा आठवतोय. खूप रडारड, सतत खिडकीपाशी बसतोय आणि नाही म्हणत असतानाही बाहेर बघतोय म्हणून आईच्या हातचे खाललेले धपाटे आठवतात. या धबडग्यात शिर्डीत कसे पोहोचलो हे स्मरत नाही.

४. शिर्डीत एकच भक्तनिवास होता. नवीन असल्याने खूप आवडला. दर्शनही निवांत आणि ब-याच वेळा घेतले. प्रसादालयात एव्हढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी प्रसाद घेण्याचेही खूप अप्रूप वाटले होते. बरोबर २०-२२ तासाने शिर्डी सोडले. पुन्हा कोपरगाववरून कालच्याच वेळेवर धावणारी मनमाड-दौंड (चू.भू.द्या.घ्या.) पॆसेंजर पकडण्यासाठी.

५. कालच्या प्रसंगातून धडा घेउन यावेळी गाडीच्या धावण्याच्या विरूद्ध दिशेकडे तोंड करून प्रवास सुरू झाला. ठिणग्यांपासून जरी थेट बचाव झाला तरी कोळश्याच्या धुळीपासून बचाव होत नसे. कपडे अगदी काळे कुळकुळीत व्हायचेत. खिडकीच्या गजांना धरून सतत असल्याने हात पण काळे होत. तो एक विशिष्ट प्रकारचा कोळशाचा आणि जंग लागलेल्या लोखंडाचा मिश्र वास आजही माझ्या नाकात भरून आहे.
रात्री ९, ९.३० च्या सुमाराला दौंडला गाडी आली. आम्ही अर्थातच गाढ झोपी गेलेलो होतो. आम्हाला कसेबसे उठवून आम्ही सगळे फ़लाटावर आलो. दौंडला फ़लाटावरच्या शाकाहारी भोजनालयात जेवण केल्याचे स्मरते. नंतर फ़लाटावरच पथारी टाकून पहाटे येणा-या सिद्धेश्वर एक्सप्रेसची वाट पहात झोपी गेल्याचे स्मरते.

६. पहाटे पहाटे कधीतरी सिद्धेश्वर एक्सप्रेस आली. गर्दी खूप. एंजिनला लागून असलेल्या डब्यात कशीबशी आम्ही सगळ्यांनी जागा मिळवली. सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणजे माझा पहिला डिझेल एंजिनच्या गाडीतूनचा प्रवास. आजही माझ्या कानात तो डिझेल एंजिनच्या धडधडण्याचा आवाज आहे. आमचा डबा अगदी एंजिनाला लागूनच होता.

७. सोलापूर शहरात उतरून एका धर्मशाळेत मुक्काम ठोकल्याचे आठवतेय. त्या काळी हॊटेल मध्ये उतरायचे वगैरे म्हणजे फ़ारच उच्च्भ्रू समजले जायचे. तिथे सगळ्यात धाकटा चि. श्रीकांत ती. दादा दाढी करीत असताना रांगत रांगत त्यांच्याजवळ गेला आणि दाढीचे ब्लेड त्याने उजव्या हाताच्या मुठीत धरून दाबले. मग काय ! रक्ताची धार आणि सोलापुरातल्या डॊक्टरांचे उंबरठे झिजवणे.

८. सोलापूर ते गाणगापूर रोड हा प्रवास बहुतेक मुंबई-मद्रास मेल ने केला. गाणगापूर रोड ते गाणगापूर हा प्रवास, टांग्यातून खूप धक्के खात. गंमत म्हणजे १९७८ नंतर आता थेट २०१३ मध्येच गाणगापूरला गेलो. मधल्या काळात भीमेतून, कृष्णेतून बरेच पाणी वाहून गेले असावे पण कर्नाटक सरकारचे रस्त्यांबद्दलचे धोरण बदललेले दिसले नाही. कुठल्याही पक्षाचे सरकार कर्नाटकात येवो पण गाणगापूरचे रस्ते सुधारले नाहीत. निव्वळ महाराष्ट्रद्वेश. दुसरे काय ?

९. गाणगापूर मात्र अगदी ठळक आठवते. उतरलो ती धर्मशाळा, तो संगम, ते मंदीर. ती माधुकरी मागण्याची प्रथा सगळ अगदी ठळक आठवतय. मला वाटत आम्ही तिथे दोन दिवस मुक्काम केला. तिस-या दिवशी तुळजापूरला जाण्याचे ठरवून तिथल्या बसस्थानकावर जाउन मी आणि ती दादा त्या दिवशी निघणा-या बसची आरक्षणेही घेउन आलोत. महाराष्ट्र राज्यात फ़िरताना आरक्षण करून फ़िरण्याचा एक दांडगा अनुभव गाठीशी होताच. पण "कानडाउ विठ्ठलूं" शी अजून पुरती भेट व्हायची होती हे आम्हाला प्रवासाच्या दिवशी कळले.

१०. ठरलेल्या दिवशी आम्ही पंधरा मिनीटे अगोदर गाणगापूरच्या बस स्थानकावर गेलो तर आमची कर्नाटक राज्य परिवहनची तुळजापूरला जाणारी बस तिथे होती फ़क्त तुडूंब भरली होती. आमच्या आरक्षित जागा असूनही कुणीही आम्हाला जागा द्यायला तयार नव्हते. तिथे आरक्षित जागा वगैरे तशी संस्कृतीच रुजलेली नव्हती. बस कंडक्टरनेही जागा मिळवून देण्यास असमर्थता दर्शवल्यावर आम्ही तिकीटे परत करून पुन्हा परतलो. भाषेचाही मोठा प्रश्न होता. आम्ही वाहिलेली शेलकी विशेषणे त्यांना कळत नव्हती. त्यांनीही काही भद्र स्वरूपाचे उद्गार आमच्या बाबतीत काढले असण्याची शक्यता नाही. आम्हाला कळले नाही म्हणून बरे.

११. पुन्हा एकदा टांग्याने धक्के खात गाणगापूर रोड स्टेशन. तिथून पुन्हा एकदा दुपारी निघणा-या मद्रास-मुंबई मेल ने सोलापूर आणि तिथून पंढरपूर.

१२. पंढरपूरची ठळक आठवण म्हणजे विठ्ठलाच्या पायापाशीच उभे राहून बाजार मांडणा-या बडव्यांना ती. दादांनी सुनावले ती. त्यांनी स्वतःच्या तोंडाने अमुक एक रक्कम इथे टाका  म्हटले. आम्हाला सर्वांना हा असला प्रकार अनपेक्षित होता. ती. दादांनी असले काही करायला नकार दिला. त्या बडव्याने तिथेच शिव्याश्राप द्यायला सुरूवात केली. "तुम्हाला पुण्य मिळणार नाही" वगैरे भाषा ऐकून मात्र मग ती. दादा भडकलेच. "अरे, मी आणि माझा विठ्ठल काय तो पापपुण्याचा हिशेब बघून घेऊ. तू दलाली करू नकोस." असे त्याला स्पष्ट सुनावून आम्ही बाहेर पडलो. हाच प्रकार इथे अगदी २०१४ पर्यंत सुरू होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या बडव्यांना विठठलापासून दूर करण्याच्या निर्णयाने मला मनापासून आनंद झाला.

१३. पंढरपूरवरून पुण्यापर्यंत. पुण्यात आमचे कौटुंबिक स्नेही श्री. जोशी साहेब यांचेकडे सदाशिव पेठेत उतरलो आणि पी.एम.टी. च्या पुणे दर्शन बसने पुण्यात फ़िरल्याचे आठवतेय.

१४. परतताना पुणे-शेगाव (बहुतेक महाराष्ट्र एक्सप्रेसने) आणि मग शेगाव-मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ-नागपूर असा प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत केलेला प्रवास. फ़ार धूसर आठवतोय. मूर्तिजापूरला श्री शामकाका (ती.दादांचे धाकटे चुलतभाऊ) आणि कारंज्याला श्री अशोककाका (ती. दादांचे थोरले चुलतभाऊ) यांच्याकडला मुक्काम आठवतो.

आता खूप सोयी झाल्यात. रेल्वेची हॊटेल्सची आरक्षणे इंटरनेटवरून सहजगत्या मिळतात पण नातेवाईकांमधला जिव्हाळा आटल्याचे सर्वत्र जाणवते. पूर्वी मुक्कामाचे पाहुणे म्हणजे गृहिणीच्या कपाळावरच्या आठ्या नसत. पाहुण्यांनाही संकोच वाटत नसे. परिस्थिती खूप चांगली नसली तरी आहे त्यात सगळ्यांना स्वीकारून पुढे जायची मनाची तयारी असायची. आता एकमेकांसाठी वेळ, जिव्हाळा उरलेला नाही. कालाय तस्मै नमः. दुसरे काय ?

या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पण माझी मुलगी चि. मृण्मयी पहिल्या वर्गात असताना २००८ मध्ये असाच एक लांबचा प्रवास करायचा ठरवला. भारतीय रेल्वेचा बराच प्रवास तोवर घडला असला तरी तो केवळ "नागपूर-पुणे-कराड" आणि "नागपूर-मुंबई" या पट्टयातच बहुतांशी होता. नाही म्हणायला २००६ मध्ये उत्तरेला वैष्णोदेवी-हरिद्वार हा प्रवास झाला होता पण नागपूरच्या दक्षिणेला तर बल्लारशाहच्या पलिकडे आपण गेलेलो नाही ही जाणीव वारंवार व्हायला लागली. आपण स्वतःला रेल्वेचे फ़ॆन म्हणवतो आणि चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर आदी परिसर आपण पाहिला नाही ही जाणीव अस्वस्थ करायला लागली आणि नोव्हेंबर २००८ मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी मी माझ्या कुटुंबासोबत बाहेर पडलो.

(क्रमशः)

Thursday, March 13, 2014

तीर्थरूप दादा,


तीर्थरूप दादा,

आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मित्रमंडळी, आपले सगळे नातेवाईक अशा या सगळ्या तुमच्या प्रेमातल्या लोकांना बोलावून एकच दणका उडवून दिला असता. २० वर्षांपूर्वी तुमचा ५१ वा वाढदिवस सुद्धा आपण अभावाच्या परिस्थितीतही छान साजरा केला होता ते आज अचानक आठवले.

पण दादा, तुम्ही अचानकच १७ वर्षांपूर्वी निघून गेलात. आज आपल्याकडले समृद्धीचे दिवस (जे केवळ तुम्ही आमच्यासाठी घेतलेल्या कष्टांमुळे आणि हाल अपेष्टांमुळे आम्हाला दिसताहेत.) पहायला तुम्ही हवे होतात असे राहून राहून वाटतय. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार हे सगळ खूप एजाॅॅय केल असतत.

आज महेश अमेरिकेत आहे. मी इथे सांगोल्यात (आता शिरपुरला) विभागप्रमुख आहे आणि श्रीकांत (तुमच्यासारखाच चोखंदळपणा बाळगत) नागपुरात आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांकडे आवर्जून गेला असतात. सगळ्या गोष्टींचा अगदी मनापासून आनंद घेतला असतात.

दादा, तुम्हाला खर सांगू ? तुम्ही गेल्यानंतर खर्‍या अर्थाने आम्हा सगळ्यांनाच या दुनियेची रीत कळायला सुरूवात झाली. "आटे चावल के भाव" कळायला सुरूवात झाली. पितृछत्र हरपणे म्हणजे काय याचा चटका बसला आणि खरच सांगतो. त्या दिवसापासून आजवर हृदयात कुठेतरी तुमच्या अभावाची जाणीव खोलवर रूतून बसली आहे. त्या दिवसानंतर मी खूप मोहरून हसलो आहे किंवा खूप गहिवरून गेलो आहे असे होतच नाही. आनंद, दुःख हे सगळ वरवरचं असतं. 

परवा माझा एक जुना मित्र जवळपास १९ वर्षांनी भेटला आणि लवकरच तो म्हणाला " राम, तू खूपच बदलला रे. पूर्वीसारखा हजरजबाबी, कुणाचीही थट्टा मस्करी करणारा, टोपी उडवणारा राहिला नाहीस. सिरीयस विचार करणारा झालायस." खरंच आहे ते. माझ्या व्यक्तीमत्वातल मी काय गमावल ते मला माहिती आहे. तुमची उणीव कधीही, कशानीही भरून येणार नाही ही जाणीव सतत माझ्या सोबत असते. जगरहाटी पाळावी लागते हे जरी खरं असलं, तरी दादा, " बात नही बनती. "

सतरा वर्षे झालीत तुम्हाला जाउन. सुरूवातीच्या महिन्या दीड महिन्यात मी रात्री रात्री झोपेतून रडत उठायचो ते याच उणीवेच्या जाणीवेमुळे. आजही दादा, वर्षातून एक दोन वेळा, तसाच झोपेतून तुमच्या आठवणींनी अस्वस्थ होऊन उठतो. जगण्यातला सगळा जीव निघून जातो. संसार आहे, कर्तव्य आहेत म्हणून पार पाडावीच लागतात पण दादा,मजा नही आता.

मला आठवतय की तुमच्या ५१ व्या वाढदिवसाला मी तुम्हाला दिलेल्या ग्रीटींगमध्ये "तुमको हमारी उमर लग जाये" अश्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्या ख-या ठरायला हरकत नव्हती. तुमच्याशिवाय रित्या झालेल्या या आताच्या आमच्या आयुष्य जगण्यापेक्षा ते बरं झालं असतं.

"कुणाचेच आईवडील आयुष्याला पुरत नाहीत", "वासांसी जीर्णानी" हे सगळ मला माहिती आहे तरी दादा, हे डोक्याने स्वीकारलय, मनाने नव्हे.

थांबतो. आम्ही सुखात रहावे म्हणून तुम्ही आयुष्यभर धडपड केलीत. त्यामुळे आता आम्ही दुःख केलेल तुम्हाला आवडणार नाही हे मला माहिती आहे. पण दादा, आज सर्व सुखाच्या क्षणांमध्ये " तुम्ही इथे आज हवे होतात " हे आमचे हवेपण संपत नाही त्याला आमचाही नाईलाज आहे.