Wednesday, February 29, 2012

बोन्साय

सुटीतल्या वेळात परिचितांकडे, नातेवाइकांकडे मी आवर्जून भेटी देतो. रोजच्या कामांच्या धबडग्यात ज्या निवांत क्षणांना. एकमेकांच्या आस्थेने केलेल्या गप्पांना आपण मुकतो ते क्षण पुन्हा अनुभवता येतात. पुढल्या सुट्टीपर्यंत आपण ताजेतवाने होउन जातो.


असाच एकदा एका स्नेह्यांकडे गेलो असताना नेहेमीप्रमाणे शिळोप्याच्या गप्पा झाल्यात लगेच ते म्हणालेत, " चला. तुम्हाला आमची बोन्सायची बाग दाखवतो. "

बाग पाहताना माझा चेहरा "अजि म्यां ब्रम्ह पाहिले" असा झाला असावा. कारण ते स्नेही अधिकाधिक उत्साहाने त्या झाडांची लागवड, जोपासणी इ. विषयी बोलायला लागले. मी मात्र हुंकार. कधी होकारार्थी कधी नकारार्थी शब्दांच्या द्वारे माझा बचाव करीत माझी सुटका करून घेतली.

परतताना तोच विचार मनात सारखा घोळत होता. खरच, किती अफ़ाट आहे नाही हा निसर्ग ! आणि त्याहून अफ़ाट आहे त्या निसर्गावर मात करणारा माणूस. आंबा, संत्री, वड, पिंपळासारख्या चांगल्या ३०-३५ फ़ूट वाढू शकणा-या झाडांची वाढ खुंटवून त्यांना २०-२५ इंचांमध्ये आणायचे. त्यात त्यांना इवली इवली पाने. फ़ुले, फ़ळे अगदी तसेच.

मग मला ते स्नेही अचानक दुष्ट वाटायला लागलेत. वाटलं की मुक्या जीवांबाबत हा काय अमानुषपणा ! पण मनात पुन्हा वाटलं की केवळ त्यांनाच दुष्ट, अमानुष म्हणून काय फ़ायदा ? आपलं शिक्षणखातं नाही का, मुलांवर त्यांच्या नैसर्गिक कलाचं, आवडीचं शिक्षण न देता त्यांची वाढ खुरटवून त्यांचा बोन्साय करून टाकत ? अनेकांचे पालकच तर त्यांच्या नैसर्गिक कलाचा विचार न करता आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादून त्यांचा बोन्साय करून टाकतात.

आपले पुढारी नाही कां, ज्या वयात तरुणांना विधायक दिशा दाखवून राष्ट्रउभारणीच काम करायचं, त्या तरुणांची माथी या ना त्या प्रक्षोभक कारणांनी भडकवून त्यांच्या मनाचा आणि एकंदर आयुष्याचाच बोन्साय करून टाकत ?

तसं पहायला गेलो तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाजमनात आज एक बोन्साय़ आहे आणि बोन्साय घडविणारेही आहेत. आपली कुवत असताना हवी तेव्हढी उंची गाठू न शकणे म्हणजे बोन्साय. बोन्साय म्हणजे कोतेपणा. बोन्साय म्हणजे निसर्गावर मात करण्याच्या वेड्या हट्टापायी स्वतःचीच केलेली प्रतारणा.

या विचारमालेतच मनात विचार चमकून गेला की स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक जीव हा ’अव्यक्त ब्रम्ह ’ असताना, जर प्रत्येकाने पूर्ण ब्रम्ह होण्याकडे वाटचाल केली, तर आपणच आपल्या "बोन्साय"पणातून बाहेर पडू. नाही कां ?

प्रा. राम प्रकाश किन्हीकर

No comments:

Post a Comment